समाजशास्त्राचा विद्यार्थी असल्याने सामाजिक अंगाने चित्रपटांचा अभ्यास करणे ओघानेच आले. अशावेळी काही क्लासिक चित्रपटांमध्ये समाजशास्त्रातील सिद्धान्तांची बीजं मिळाली. ती तशी मिळणे ही घटना रोचक आणि आनंददायी होती. मग आपोआपच अभ्यासामुळे समाजशास्त्राच्या खुणा चित्रपट पाहताना शोधल्या जाऊ लागल्या. अर्थातच चित्रपटाच्या लेखक दिग्दर्शकाचा समाजशास्त्राचा अभ्यास असेल असे नाही या गोष्टीची मला जाणीव होती. मात्र या कलाकारांचा समाजाचा अभ्यास मात्र खुप बारकाईचा असावा हे लक्षात आले आणि समाजाच्या अशा गहन अभ्यासावरच तर विद्वान मंडळी सिद्धान्त बांधत असतात. असेच एक दृश्य “गॉडफादर” (पहिला भाग) चित्रपटाच्या सुरुवातीला आहे. किंबहूना चित्रपटाची सुरुवातच या अविस्मरणीय दृश्याने होते. गॉडफादरच्या मुलीचे लग्न आहे. शाही सोहळा आहे. त्यातच सिसिलियन पद्धतीचे ते लग्न. त्याला भेटायला येणारी माणसं. गॉडफादरविषयीची त्यांची आपुलकी, आदराची भावना. ती भावना व्यक्त करण्याची त्यांची पद्धत अशा अनेक गोष्टी या दृश्यात आहेत. त्याचवेळी खरा सिसिलियन मुलीच्या विवाहाच्यावेळी जर कुणी कसली मागणी केली तर ती नाकारत नाही असा एक अलखित नियम माहीत असलेला बोनासेरा नावाचा गृहस्थ गॉडफादरकडे येतो.
त्याच्यामुलीवर अत्याचार केलेले दोन गुंड कोर्टातून सुखरूप सुटलेले असतात. आणि आता त्याला गॉडफादरकडून न्याय हवा असतो. हे अविस्मरणीय दृश्य सर्वांना ठावूक असेलच. आपल्या विषयाच्या अनुषंगाने सांगायचं तर गॉडफादर त्याची मागणी मान्य करतो आणि त्याला सांगतो,” कधीतरी मला काही गरज लागली, कदाचित ती वेळ कधीच येणार नाही. मी तुला एखादे काम करण्यास बोलावेन”. यालाच सोशल कॅपिटलचा देवाणघेवाणीचा नियम म्हणतात. मी तुझे काम करतो तु माझे काम कर. यावर सोशल कॅपिटलचा सारा डोलारा उभा राहिलेला दिसतो. बहुधा बोनासेराला सोशलकॅपिटलचा हा नियम माहित असावा कारण गॉडफादर त्याला विचारतो की तु यापूर्वी माझ्याकडे का आला नाहीस? तेव्हा तो उत्तर देतो की “I didn’t want to get into trouble. ” ही गोष्ट सर्वसामान्यपणे सर्वांनाच माहित असते. कदाचित सज्जन माणसं त्यांनी आपल्यावर केलेले उपकार विसरतील पण दुर्जन कधीही त्याने केलेले उपकार विसरत नाहीत. आणि वेळ येताच त्याची परतफेड करून घेण्यासाठी समोर उभे राहतात. येथे अनासक्ती, निरपेक्ष मदत, नेकी कर और दर्यामें डाल अशासारख्या गोष्टींना जागा नाही.
वेळ आली असताना मी तुझी मदत केली आता मला गरज आहे तेव्हा तु मला मदत केलीच पाहिजेस असा हा प्रकार असतो. बारकाईने लक्ष दिलं तर संपूर्ण गॉडफादर चित्रपटच या संकल्पनेवर आधारलेला आहे. सारी कुकर्म करणारी माणसे हा देवाणघेवाणीचा नियम पाळत असतात. जो कुणी पाळणार नाही त्याला ठार मारलं जातं. मित्र मिळवण्याची गरज आणि एकमेकांना काही केलेले “फेवर्स” अशातून हे नेटवर्क बांधले जाते आणि ज्याचे नेटवर्क सगळ्यात जास्त ताकदवान असते तो गॉडफादर असतो. सारे राजकीय पुढारी त्याच्या खिशात असतात. कारण त्याने कुठल्यान कुठल्या बाबतीत त्यांना मदत केलेली असते. सोशल कॅपिटलवर सकारात्मक लेखन, संशोधन खुप झालेलं आहे. आमच्या समाजशास्त्रात एक फार मोठा विद्वानांचा वर्ग या सिद्धान्ताचे गोडवे गात असतो. मात्र गॉडफादरसारखे चित्रपट अशा संकल्पनांमध्ये नकारात्मक काय असु शकतं हे ठळकपणे दाखवून देतात.
सामाजिक भांडवलाची संकल्पना विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात उदयाला आली. पण त्यावर विशेष संशोधन झाले नव्हते. पुढे फ्रेंच समाजशास्त्रज्ञ पिअरी बोर्द्यु आणि अमेरिकन समाजशास्त्रज्ञ रॉबर्ट पुटनम यांनी या संकलनेचा विस्तार केला. दोघांनी जरी सोशल कॅपिटलचाच विचार केला असला तरी दोघांच्या दिशा पूर्णपणे विरुद्ध होत्या. पुटनमसाठी सोशल कॅपिटल ही मानवी जीवनाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक अशी बाब होती. त्याने अमेरिकन समाजातील अनेक अनिष्ट बाबींसाठी सोशल कॅपिटलच्या कमतरतेला जबाबदार धरले. त्याच्या “बॉलिंग अलोन” या लेखात अमेरिकन लोक टिव्हीला चिकटून राहतात आणि पूर्वीप्रमाणे समाजात फारसे मिसळत नाहीत. त्यामुळे एकंदरीतच सोशल कॅपिटल कमी झाले असून त्यामुळे सामाजिक समस्या वाढत आहेत असे निदान पुटनमने केले. सोशल कॅपिटलवरील संशोधनाने पुटनम इतका लोकप्रिय झाला की त्याला जवळपास एखाद्या सेलेब्रिटीचा दर्जा मिळाला.
बोर्द्युने मात्र याउलट सोशलकॅपीटलचा वापर समाजात नकारात्मकरित्या कसा केला जातो हेच सांगण्यावर भर दिला. एखाद्या गटाशी, संस्थेशी, समाजाशी जेव्हा माणुस जोडला जातो तेव्हा त्या संस्थेचे स्वतःचे एक सामाजिक भांडवल असते. ते कुठल्याही स्वरुपात असु शकते. ते आर्थिक स्वरुपात असेल. कदाचित त्या गटाची एखादी पतपेढी असेल. ते शैक्षणीक स्वरुपात असेल. कदाचित त्या संस्थेच्या शाळा असतील, इतर शैक्षणिक संस्था असतील. आणि असे असल्यास त्या गटाशी जोडल्या गेलेल्या माणसाला या भांडवलाचा वापर करता येऊ शकतो. अशा वेळी या सोशल कॅपिटलमुळेच कशा अनिष्ट सामाजिक रुढी पडतात आणि त्यामुळे सामाजिक विषमता राखण्यास कशी जन्माला येते किंवा असलेली सामाजिक विषमता पुन्हा पुन्हा अधोरेखित केली जाते हे बॉर्द्युने वारंवार सांगितले. आमच्या एका नातेवाईकाची हकिकत आहे. मुंबईच्या कापडगिरण्या बंद झाल्यावर वडिलांच्या ओळखीमुळे कुणा नेत्याने या मुलाला सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते मुलाने नम्रपणे नाकारून राहण्याच्या जागेपासून लांबवर का होईना पण स्वतःचे स्टेशनरीचे दुकान उघडले. मला कारण सांगताना तो म्हणाला की ही नेते मंडळी उपकारांची परतफेड म्हणून काय अपेक्षा करतील सांगता येत नाही. आमच्या या नातेवाईकाने नकळत सोशलकॅपिटलच्या मूलभूत नियमाला स्पर्श केला होता.
अतुल ठाकुर