Home Blog

AI आणि समुपदेशन

कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर आता सर्वच क्षेत्रात होऊ लागल्याने आमचं मानसोपचार हे क्षेत्रही त्याला अपवाद नसणारच. अलिकडेच समुपदेशनासाठी जे चॅट ऍप वापरले जाते ते पाहिले. मला नैराश्य आहे असे सांगून त्या ऍपसोबत अगदी थोडावेळच संवाद करण्याचा प्रयत्न केला. एकंदर प्रकार मला झेपला नाही. कदाचित हा माझ्या वैयक्तिक आवडीनिवडीचा भाग असेल पण मला समोर हाडामांसाचा माणुस असल्याशिवाय संवाद साधताच येत नाही. मी फ्रि प्लानवर होतो. त्यामुळे पैसे भरल्यावर जास्त सोयी असतील हे मला माहित होते. पण जास्तीत जास्त काय असेल? तर अगदी तुम्हाला प्रत्यक्ष माणसाशी संवाद झाला असे वाटावे अशा तऱ्हेचे वातावरण तयार केलेले असेल. AI म्हणजे माणसाचा आभासच असतो. पण तो आभासच. प्रत्यक्ष माणुस नाही. या टप्प्यावर त्याबद्दल फार काही बोलता येणार नाही कारण मानसोपचार आणि AI क्षेत्राने अजून बराच पल्ला गाठायचा आहे. पण पुढे काय होईल याचा अंदाज बांधता येईल.

मानसोपचारातील निरनिराळ्या पद्धती वापरण्यात AI वाकबगार असेल. तुम्हाला CBT हवंय की REBT की DBT की ACT की सर्वसमावेशक पद्धतीचा वापर हवा आहे? तुम्हाला आज कुठल्या समस्येवर काम करायचं आहे हे विचारलं जाईल. AI चा प्रतिसाद अतिशय सकारात्मक असेल. वापरले जाणारे शब्द हे तुमचा उत्साह वाढवणारे असतील. पैसे भरल्यास तुमच्याशी AI तुमच्या भाषेत संवाद करु शकेल. बहुधा अतिशय देखणी व्यक्ती तुमची समुपदेशक असेल. किंबहूना शंभर देखणे फोटो तुम्हाला दाखवले जातील त्यातून तुम्हाला आवडलेली व्यक्ती तुम्हाला समुपदेशक म्हणून निवडता येईल. तिने कुठला वेष परीधान करावा हे देखील कदाचित तुम्ही ठरवाल. तुमच्या कानाला गोड वाटणारा आवाज तुम्हाला निवडता येईल. हे सारं ठिक आहे. पण तुमची त्यावेळची मनःस्थिती जाणून घ्यायला नुसते शब्दच नाहीत तर तुमच्या देहबोलीचा अभ्यास अत्यावश्यक असतो असे मला वाटते ते AI ला कसे समजणार? मात्र मला पडलेला प्रश्न याहूनही वेगळा आहे.

आज अनेक वर्षे माणुस समाजमाध्यमात आहे आणि इंतरनेटचा वापर करत आहे. प्रत्यक्ष माणुस समोर दिसत नसताना, त्याच्याशी संवाद होत नसताना, पलिकडे स्त्री आहे की पुरुष हे देखील माहित नसताना आपले हजारो जरी मित्र आंतरजालावर असले तरी त्याची त्यामुळे माणसाची भूक भागत नाही हे आता अनेकांच्या लक्षात येऊ लागले आहे.त्यामुळे अनेक मानसिक समस्याही उद्भवत आहेत. समाजमाध्यमात अनेक वर्षे संवाद साधणाऱ्या माणसांना नंतर एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्याची ओढ लागते. माणसाला जेव्हा प्रत्यक्ष माणसाशीच संवाद करुन समाधान मिळणार असेल तर तेथे AI चा उपयोग काय असणार? एका ठिकाणी AI चा मागोवा घेताना एक विधान असे केले गेले की काही कालाने माणसे कृत्रिम गोष्टींना कंटाळतील आणि मग मॅनमेड गोष्टींची चलती सुरु होईल. हे खरं तर नवं नाही. आजदेखील हस्तकलेची चलती आहेच.

ह्युमन टच ही मला समुपदेशनातील अत्यंत महत्वाची गोष्ट वाटते जिची पूर्तता AI ने दिलेल्या कुठल्याही सोयीने होईल असे आजतरी मला दिसत नाही. माणसाला समाजप्रिय प्राणी म्हटले जाते. ज्यांना जबरदस्तीने एकटे राहावे लागते त्यांना मानसिक समस्या निर्माण होताना दिसतात. किंबहूना समाजात वावरण्याचा हक्क नसणे हेच सुधारलेल्या आजच्या जगात शिक्षेचे स्वरुप आहे म्हणूनच सर्व देशांमध्ये गुन्हेगारांना तुरुंगात पाठवले जाते. असे असताना माणसाने माणसाला समजून घेणे आणि त्यावर दोघांनी मिळून उपाय शोधणे हा जो समुपदेशनाचा गाभा आहे नेमका तोच AI मध्ये गायब झालेला आहे. बाकी सारे असले तरी जे हवे तेच नाही.याचा अर्थ हे तंत्रज्ञान निरुपयोगी आहे असा नाही. माणसाची आवश्यकता लक्षात घेऊन वैज्ञानिक शोधाला एका फटक्यात रद्दबादल करण्याची माझी भूमिकाच नाही. AI हे मानसोपचारातील नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरु शकेल.

नवनवीन शोध, मानसोपचर पद्धती यांची माहिती, माणसाच्या भाषेचे आकलन, त्या भाषेचे मानसोपचाराच्या दृष्टीने विश्लेषण याला AI चे प्रचंड सहाय्य होऊ शकते. समाजमाध्यमातील प्रचंड डाटा समोर असल्यावर त्याचे भावनिक अंगाने कमीत कमी वेळात विश्लेषण करणे हे AI ला शक्य आहे. त्यावरुन एकंदर चर्चेचा कल लक्षात येऊ शकतो. त्याच्याही मर्यादा असतील. पण तरीही तेथे AI वापरता येईल. AI ला डोक्यावर स्वार होऊ देऊन त्याच्या आहारी जायचे की त्याची बलस्थाने लक्षात घेऊन त्याचा वापर स्वतःसाठी करून घ्यायचा याचे भान निदान मानसोपचारांच्या बाबतीत असायला हवे असे मला वाटते. मानसोपचारासाठी चॅटबॉटचा वापर करणे ही वैयक्तिक आवड असू शकेल पण ह्युमन टच ला मानसोपचारांमध्येतरी पर्याय नाही अशी माझी समजूत आहे.

अतुल ठाकुर

चित्रपटातील एका (पुन्हा न पाहिलेल्या) दृष्याबद्दल

काहीवेळा आपली आपल्यालाच नविन ओळख होते. अरेच्या आपण असे आहोत. आपल्यात हा देखिल एक कंगोरा आहे. आणि आपले आपल्यालाच आश्चर्य वाटते. हिन्दी चित्रपट पाहण्याची सुरुवात अगदी लहानपणापासून झाली. सर्व तर्‍हेचे चित्रपट पाहिले. जसजशी समज वाढली तसा मसाला चित्रपट म्हणजे काय ते लक्षात आलं. चित्रपटात मसाला टाकला जातो. त्यात मारामार्‍या असतात. नृत्य असतात. तोकड्या कपड्यात वावरणार्‍या नायिका असतात. हेलनच्या कॅब्रे नृत्याने पडदा पेटायचा. आणि आम्हीही…यात कधी काही गैर वाटलं नाही. हिंसेचा अतिरेक असलेले चित्रपट पाहिले. धक्कादायक दृश्ये पाहिली. पण कधी एखादे दृश्य पुन्हा कधीही पाहू शकणार नाही असे वाटले नाही. आणि बर्‍याच वर्षांनी चार्लस ब्रॉन्सनचा डेथ विश (पहिला भाग) पाहिला.

ब्रॉन्सन हा माझा अतिशय आवडता अभिनेता. मात्र डेथ विश हा मला त्याचा सर्वात जास्त आवडणार चित्रपट नव्हे. ती जागा सर्जीयो लियॉनीच्या “वन्स अपॉन अ टाईम इन द वेस्ट” ने घेतली आहे. अर्थात डेथ विश हा देखील अतिशय उत्तम चित्रपट. या विजिलांटीच्या थीम वर पुढे कित्येक चित्रपट निघाले. समाजातील गुन्हेगारीसमोर जेव्हा पोलिस हतबल होतात तेव्हा समाजातीलच या गुन्हेगारीने पोळलेला एक सर्वसामान्य माणूस कायदा हातात घेऊन गुन्हेगारांना ठार मारतो आणि पोलिसांची त्याला सहानुभूती असते. हे कथानक आपल्यापैकी अनेकांनी ओळखीचे वाटेल. या चित्रपटात अगदी सुरुवातीलाच ब्रॉन्सनच्या बायको आणि मुलीवर अत्याचार होतो. बायको मृत्युमुखी पडते आणि मुलगी मानसिकदृष्ट्या कायमची अपंग होते. यानंतर ब्रॉन्सन कायदा हातात घेतो. तो सर्व प्रवासच जबरदस्त.

पण मला बोलायचंय ते त्या अत्याचाराच्या दृश्याबद्दल. ते पहिल्यांदा पाहिलं आणि खुप धक्का बसला होता. त्यानंतर आजवर असंख्यवेळा डेथविश पाहिला असेल. पण कधीही ते दृश्य पुन्हा पाहु शकलो नाही. जेव्हा जेव्हा हा चित्रपट पाहिला तेव्हा हे दृश्य टाळून मी पुढचा चित्रपट पाहात असतो. मला हे माझ्यासाठी नविनच होतं. तेव्हा लक्षात आलं कि सिनेमा हे प्रामुख्याने दिग्दर्शकाचं माध्यम आहे. तो दाखवेल ते आणि तो दाखवेल तसं आम्ही पाहणार. काही प्रेक्षकांच्या सोयीसाठी टाकलेला मसाला असेल तर ते दृश्य तसेच दिसणार. प्रेक्षक ते मिटक्या मारत पाहणार आणि तुम्हाला बलात्कार्‍यांची घृणा यावी असं वाटत असेल तर ते ही दिग्दर्शकाच्याच हातात आहे. ब्रॉन्सनच्या बायको आणि मुलीवर चित्रित झालेला तो सीन इतका अंगावर येणारा आहे की त्यानंतर ब्रॉन्सन निघृणपणे गुन्हेगारांना ठार मारतो ते (कायद्याच्या दृष्टीने गैर असले तरी) गैर वाटत नाही. प्रेक्षक नकळत त्याच्या बाजूने होऊ लागतात.

नंतर लक्षात आले काही चित्रपट, काही दृश्ये बहुधा आपण पुन्हा पाहु शकणार नाही इतके कारुण्य त्यात असते. आणि ही दिग्दर्शकाची कमाल असते.

अतुल ठाकुर

ये कौन आया रौशन हो गयी महफिल किसके नाम से

हिन्दी चित्रपटात “अमीर बापकी बेटीचे” लक्ष आपल्या कडे वेधून घेणारा “गरीब घर का नायक” आपल्याला सर्वांच्याच अतिपरिचयाचा आहे. पार्टी असेल मग तर पाहायलाच नको. आपला नायक गाणे म्हणणार आणि त्या गाण्यात नायिका आपल्याला कसे उपेक्षेने मारून राहिली आहे असा दुखडा गाण्याच्या मुखड्यात सुनावणार. त्या अमिराच्या घरी पियानो असणार आणि आपल्या गरीब नायकाला बाकी काही आले नाही तरी पियानो नक्की वाजवता येत असणार. असो. पण १९६८ साली आलेल्या साथी चित्रपटात हे सारे चित्र उलटे फिरलेले आहे. “ये कौन आया रौशन हो गयी महफिल किसके नाम से” म्हणणारी सौंदर्यवती आहे सिमी गरेवाल आणि तिला उपेक्षेने मारून राहिला आहे तो आपला ज्युबिली स्टार राजेन्द्र कुमार. अर्थात पार्टी अमिर लोकांचीच दिसते आहे.

पियानोवर सिमीची बोटं फिरतात आणि हँडसम राजेंद्रकुमार प्रवेशतात. यात हा ज्युबिली स्टार सुटमध्ये इतका देखणा दिसला आहे की “बा अदब बा मुलाहिजाच” म्हणावे. तो आला आणि त्याने जिंकले अशा चालीने साहेब येतात आणि लताची मधाळ स्वरातली आलापी ऐकू येते. त्या काही क्षणाच्या आ हा हा मध्येच लता संपूर्ण गाणे घेऊन गेली आहे. पार्टी आहे. आजुबाजुला मैत्रिणी आहेत. आपल्याला आवडणारे माणूस येथे येणार आहे. नव्हे आले आहे. आपल्या प्रेमाचे माणुस येणार असेल तर झालेल्या आनंदाने स्त्री असते त्यापेक्षा जास्तच सुरेख दिसते. अगदी तशीच नारिंगी आणि मोतिया रंगाची साडी नेसलेली सिमी आहे त्यापेक्षाही जास्त देखणी दिसते आहे. प्रियकर आल्याचा तिच्या चेहर्‍यावर आनंद तर आहेच पण एक लाजरे स्मितही सतत झळकते आहे. संपूर्ण गाणे सिमीच्या चेहर्‍यावर ते लाजरे हसू आहे.

अशावेळी लताचे “आ हा हा” सुरु होते आणि एकदम कारंजे उसळताना दाखवले आहे. जणू सिमीच्या हृदयात उसळलेले प्रेमाचे कारंजेच दिग्दर्शकाला पडद्यावर दाखवायचे आहे. या उसळलेल्या आनंदाला जर आवाज लाभला तर तो कसा असेल? अगदी लताने या गाण्यासाठी दिलेल्या आवाजासारखाच. आपलं प्रेमाचं माणुस आल्यावर आनंदलेल्या आवाजात जो प्रकाश असतो तो या गाण्यात लताच्या आवाजात आपल्याला ऐकू येतो. बाकी आपल्या नायकाचे या देखण्या आणि त्याचीच मनधरणी करणार्‍या नायिकेकडे लक्षच नाहीये. तो तिच्यासमोर थांबतो, तिच्याकडे कौतूकाने पाहतो. पण तिला त्याच्या चेहर्‍यावर खास तिच्यासाठी जे दिसायला हवे ते मात्र दिसत नाही. साहेब पार्टीतल्या इतर लोकांची वास्तपुस्त करीत राहतात. कदाचित म्हणूनच मजरूह सुलतानपुरी या गीतात लिहून गेले आहेत.

क्या कहीये इस आने को, आया है तरसाने को
देखा उस ने हँस हँस के, हर अपने बेगाने को
लेकिन कितना बेपरवाह है, मेरे ही सलाम से

नौशादचे या चित्रपटातले संगीत अतिशय श्रवणीय आहेच पण त्याच्या नेहेमीच्या स्टाईलपेक्षा वेगळेच वाटते. या चित्रपटातील मुकेशचे मास्टरपीस “हुस्ने जाना इधर आ, आईना हूं मै तेरा” मध्ये जुना नौशाद आपल्याला परत भेटतो. गाण्याच्या चाली गोड आहेत पण बरीच आधुनिक वाद्ये वापरलेली दिसताहेत. पण जे काही रसायन जमले आहे ते कर्णमधूरच आहे. फक्त वेगळे वाटते इतकेच. सिमीबद्दल काय सांगणार? कधी कधी वाटतं तिचं टिपिकल भारतीय न दिसणं तर तिच्या कारकीर्दीला मारक झालं नसावं? या अतिशय गुणी अभिनेत्रीला म्हणावा तसा वाव मिळालाच नाही. भुमिकांना पुरेसा न्याय देऊनही तिला मुख्यप्रवाहातही स्विकारले गेले नाही आणि समांतर चित्रपटही तिच्यापासून दूरच राहिले.

काहीही न बोलता आपल्या देखणेपणाने आणि नुसत्या सहज वावराने राजेंद्रकुमार सीन घेऊन जातो. त्याचे चालणे, हसणे, कोटाच्या खिशात हात घालून उभे राहणे सारेच देखणे. तो आल्यावर पार्टी जणु उजळून निघते. आणि सिमी म्हणते…मेरे घर में जैसे सूरज निकला है शाम से…

अतुल ठाकुर

किरातार्जुनीयम् चे देणे

संस्कृतातील अनेक नाटकांमधल्या अनेक गोष्टी आवडतात हे खरे असले तरी भारविच्या किरातार्जुनीयम् नाटकातील अकरावा सर्ग हा माझ्या फार आवडीचा आहे. मानसशास्त्राचा अभ्यास सुरु केल्यावर तर तो मला नुसता आवडीचाच नाही तर पुन्हा पुन्हा वाचण्याजोगा वाटू लागला आहे. आपण एखादी चांगली गोष्ट सुरु केल्यावर आपल्या समोर येऊन आपल्याला हतोत्साह करणारी अनेक माणसे असतात. काहीजण काळजीच्या नावाखाली तुमच्या मनात नकारात्मकता पेरून जातात. काहीजण तुम्ही घेतलेले काम थांबबावे म्हणूनच मनात भीती पेरतात. आपण पुरेसे सावध असलो ही माणसे ओळखायला वेळ लागत नाही. मात्र याहूनही सूक्ष्म प्रकार आहे जो तत्वज्ञानाच्या रुपाने अवतरतो. याचा प्रतिकार अवघड असतो. त्याने जर तुमच्या मनाचा ताबा घेतला तर तुमच्यातच काम सुरु करण्याचा उत्साह राहत नाही. मग इतरांनी तुम्हाला थांबवण्यासाठी वेगळे काही करण्याची गरजच उरत नाही. किरातार्जुनीयम् मध्ये अर्जुन महाभारत युद्धासाठी साक्षात शंकराकडून शस्त्र मिळवण्यासाठी तप करीत असल्याची कथा आहे. या कथेची पार्श्वभूमी आधी लक्षात घ्यायला हवी.

द्युतात हरलेले, द्रौपदीच्या वस्त्रहरणामुळे अपमानीत झालेले पांडव वनवास आणि अज्ञातवासाची शिक्षा भोगण्यासाठी बाहेर पडले आहेत. आणि युद्ध अटळ आहे याची युधिष्ठीराला जाणीव झालेली आहे. अशावेळी आपले पारडे वरचढ असावे यासाठी त्याने अर्जुनाला शस्त्र मिळविण्यासाठी तप करायला पाठवले आहे. अर्जुन आधी इंद्राची प्रार्थना करीत आहे. यावेळी इंद्राने वृद्धाचे रुप धारण करुन अर्जुनाची परीक्षा पाहण्यासाठी जो उपदेश केला आहे तो उपदेश आणि त्याला अर्जुनाने जे उत्तर दिले आहे ते उत्तर हा माझ्या अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. अलिकडे समुपदेशन, निरनिराळे कोचेस, हिलर्स यांचे पिक भयानक फोफावले आहे. त्यात बरेचदा जो उपदेश केला जातो त्याची मूळं आपल्याला इंद्राच्या या छद्मी उपदेशात मिळू शकतात. इंद्राने येथे तरुण वयात अर्जुन तपस्येला, मोक्षाच्या साधनेला लागला आहे याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मात्र त्याचा युद्धवेष पाहून खंतही व्यक्त केली आहे. तपश्चर्येने मोक्ष मिळवायचे सोडून तू शत्रूवर विजय प्राप्त करायची इच्छा ठेवतो आहेस हे चुकीचे आहे असे इंद्र सांगतो.

आणि इंद्राच्या भाषणाचा शेवटचा भाग तर मास्टरस्ट्रोक म्हणता येईल असा आहे. तो म्हणतो तुला शत्रूंनाच जिंकायचं असेल तर स्वतःतील षडरिपुंना जिंक. त्यांना जिंकलंस की जग जिंकल्यासारखेच होईल. आपल्यावर अन्याय झाला तरी तो सहन करावा, आपली मनःशांती ढळू देऊ नये. मोक्षाची साधना करावी अशासारखा पराक्रमाला, विजिगिषु वृत्ती संपूर्णपणे जिरवून टाकणारा हा उपदेश आहे. हा आजच्या काळातही माणसे करत असतात. शब्द वेगळे असतील. अलिकडे मानसशास्त्रात समुपदेशन करताना “दुःख हे आपल्या दृष्टीकोणावर अवलंबून असतं अन्यथा आपल्या बाहेर दुःख असं काही नसतं. त्यामुळे आपण बदलायला हवं” असा एक पवित्रा घेतला जातो. समाजशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे मला हे विधान कधीही पटले नाहीच पण ते नेहेमी हस्यास्पदही वाटत आले. गंमत म्हणजे खुद्द मानसशास्त्रात या लोकप्रिय दाव्याच्या विरोधात मत असलेलीही माणसे आहेत. (पहाःफेमिनिस्ट थेरेपी) फक्त त्यांची माहिती अनेकांना नसते. आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर माहिती असली तरी ती अनेकांना झेपणारीही नसते. त्यापेक्षा दृष्टीकोण बदलला म्हणजे परिस्थिती बदलते हे स्वीकारणं जास्त सोपं असतं.

गंमत म्हणजे आपल्याला ठिकठिकणी वाईट माणसे दिसत असतात. अगदी दररोजही दिसत असतात. ती वाईट असणं हे आपल्या दृष्टीकोणावर जराही अवलंबून नसतं. त्यांचा स्वभावच विषारी असतो. आपल्याला वाईट परिस्थितीही दिसत असते. शोषण करणाऱ्या संस्था, गट, माणसेही दिसत असतात. जगातले हे दुःख सर्वस्वी आपल्या दृष्टीकोणावर अवलंबून असते असे मला कधीही वाटले नाही. आणि अर्जुनाचे इंद्राला दिलेले उत्तर असेच आहे. अर्जुन हा तत्वज्ञानाची चर्चा करणारा माणुस मला कधीही वाटला नाही. गीतेत चर्चा भगवंत करतात. अर्जुन त्याला प्रामाणिकपणे पडलेले प्रश्न विचारतो. त्यामुळे हा अजोड धनुर्धर असला तरी सरळसोट गडी आहे. त्याने पहिल्याच वाक्यात सिक्सर ठोकली आहे. तो इंद्राला म्हणतो “तुम्हाला माझ्याबद्दल काहीही माहित नसताना तुम्ही मला हा उपदेश करीत आहात. तो व्यर्थ आहे. चमचमणारे तारे पाहायचे तर दिवस योग्य नाही रात्र योग्य आहे. त्याप्रमाणे या उपदेशाला मी योग्य नाही.” पुढे अर्जुन स्वतःची ओळख देतो. पांडवांचा झालेला अपमान, द्रौपदीची विटंबना, वनवास, अज्ञातवासाची शिक्षा याबद्दल सांगतो. आम्हाला झाल्या अपमानाबद्दल किती लाज वाटते हे देखील सांगतो. अशावेळी आपले कर्तव्य काय याबद्दल अर्जुनाच्या मनात काडीचीही शंका नसते. शत्रूला पराभूत करणे हा आपला एकमेव उद्देशच नव्हे तर कर्तव्यदेखील आहे हे अर्जुन वारंवार सांगतो.

परीक्षा पाहायला आलेला इंद्र अर्थातच संतुष्ट होऊन अर्जुनाला पुढे शंकाराच्या उपासनेचा मार्ग दाखवतो. पराक्रमाची विजिगिषु वृत्तीची भलावण करणारा हा अकरावा सर्ग वाचला की माझ्या मनात नेहेमी उत्साहाचा संचार होतो. म्हणून अलिकडे तो पटकन हाताशी लागेल असा मी ठेवला आहे.

अतुल ठाकुर

गॉडफादर आणि सोशल कॅपिटल

समाजशास्त्राचा विद्यार्थी असल्याने सामाजिक अंगाने चित्रपटांचा अभ्यास करणे ओघानेच आले. अशावेळी काही क्लासिक चित्रपटांमध्ये समाजशास्त्रातील सिद्धान्तांची बीजं मिळाली. ती तशी मिळणे ही घटना रोचक आणि आनंददायी होती. मग आपोआपच अभ्यासामुळे समाजशास्त्राच्या खुणा चित्रपट पाहताना शोधल्या जाऊ लागल्या. अर्थातच चित्रपटाच्या लेखक दिग्दर्शकाचा समाजशास्त्राचा अभ्यास असेल असे नाही या गोष्टीची मला जाणीव होती. मात्र या कलाकारांचा समाजाचा अभ्यास मात्र खुप बारकाईचा असावा हे लक्षात आले आणि समाजाच्या अशा गहन अभ्यासावरच तर विद्वान मंडळी सिद्धान्त बांधत असतात. असेच एक दृश्य “गॉडफादर” (पहिला भाग) चित्रपटाच्या सुरुवातीला आहे. किंबहूना चित्रपटाची सुरुवातच या अविस्मरणीय दृश्याने होते. गॉडफादरच्या मुलीचे लग्न आहे. शाही सोहळा आहे. त्यातच सिसिलियन पद्धतीचे ते लग्न. त्याला भेटायला येणारी माणसं. गॉडफादरविषयीची त्यांची आपुलकी, आदराची भावना. ती भावना व्यक्त करण्याची त्यांची पद्धत अशा अनेक गोष्टी या दृश्यात आहेत. त्याचवेळी खरा सिसिलियन मुलीच्या विवाहाच्यावेळी जर कुणी कसली मागणी केली तर ती नाकारत नाही असा एक अलखित नियम माहीत असलेला बोनासेरा नावाचा गृहस्थ गॉडफादरकडे येतो.

त्याच्यामुलीवर अत्याचार केलेले दोन गुंड कोर्टातून सुखरूप सुटलेले असतात. आणि आता त्याला गॉडफादरकडून न्याय हवा असतो. हे अविस्मरणीय दृश्य सर्वांना ठावूक असेलच. आपल्या विषयाच्या अनुषंगाने सांगायचं तर गॉडफादर त्याची मागणी मान्य करतो आणि त्याला सांगतो,” कधीतरी मला काही गरज लागली, कदाचित ती वेळ कधीच येणार नाही. मी तुला एखादे काम करण्यास बोलावेन”. यालाच सोशल कॅपिटलचा देवाणघेवाणीचा नियम म्हणतात. मी तुझे काम करतो तु माझे काम कर. यावर सोशल कॅपिटलचा सारा डोलारा उभा राहिलेला दिसतो. बहुधा बोनासेराला सोशलकॅपिटलचा हा नियम माहित असावा कारण गॉडफादर त्याला विचारतो की तु यापूर्वी माझ्याकडे का आला नाहीस? तेव्हा तो उत्तर देतो की “I didn’t want to get into trouble. ” ही गोष्ट सर्वसामान्यपणे सर्वांनाच माहित असते. कदाचित सज्जन माणसं त्यांनी आपल्यावर केलेले उपकार विसरतील पण दुर्जन कधीही त्याने केलेले उपकार विसरत नाहीत. आणि वेळ येताच त्याची परतफेड करून घेण्यासाठी समोर उभे राहतात. येथे अनासक्ती, निरपेक्ष मदत, नेकी कर और दर्यामें डाल अशासारख्या गोष्टींना जागा नाही.

वेळ आली असताना मी तुझी मदत केली आता मला गरज आहे तेव्हा तु मला मदत केलीच पाहिजेस असा हा प्रकार असतो. बारकाईने लक्ष दिलं तर संपूर्ण गॉडफादर चित्रपटच या संकल्पनेवर आधारलेला आहे. सारी कुकर्म करणारी माणसे हा देवाणघेवाणीचा नियम पाळत असतात. जो कुणी पाळणार नाही त्याला ठार मारलं जातं. मित्र मिळवण्याची गरज आणि एकमेकांना काही केलेले “फेवर्स” अशातून हे नेटवर्क बांधले जाते आणि ज्याचे नेटवर्क सगळ्यात जास्त ताकदवान असते तो गॉडफादर असतो. सारे राजकीय पुढारी त्याच्या खिशात असतात. कारण त्याने कुठल्यान कुठल्या बाबतीत त्यांना मदत केलेली असते. सोशल कॅपिटलवर सकारात्मक लेखन, संशोधन खुप झालेलं आहे. आमच्या समाजशास्त्रात एक फार मोठा विद्वानांचा वर्ग या सिद्धान्ताचे गोडवे गात असतो. मात्र गॉडफादरसारखे चित्रपट अशा संकल्पनांमध्ये नकारात्मक काय असु शकतं हे ठळकपणे दाखवून देतात.

सामाजिक भांडवलाची संकल्पना विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात उदयाला आली. पण त्यावर विशेष संशोधन झाले नव्हते. पुढे फ्रेंच समाजशास्त्रज्ञ पिअरी बोर्द्यु आणि अमेरिकन समाजशास्त्रज्ञ रॉबर्ट पुटनम यांनी या संकलनेचा विस्तार केला. दोघांनी जरी सोशल कॅपिटलचाच विचार केला असला तरी दोघांच्या दिशा पूर्णपणे विरुद्ध होत्या. पुटनमसाठी सोशल कॅपिटल ही मानवी जीवनाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक अशी बाब होती. त्याने अमेरिकन समाजातील अनेक अनिष्ट बाबींसाठी सोशल कॅपिटलच्या कमतरतेला जबाबदार धरले. त्याच्या “बॉलिंग अलोन” या लेखात अमेरिकन लोक टिव्हीला चिकटून राहतात आणि पूर्वीप्रमाणे समाजात फारसे मिसळत नाहीत. त्यामुळे एकंदरीतच सोशल कॅपिटल कमी झाले असून त्यामुळे सामाजिक समस्या वाढत आहेत असे निदान पुटनमने केले. सोशल कॅपिटलवरील संशोधनाने पुटनम इतका लोकप्रिय झाला की त्याला जवळपास एखाद्या सेलेब्रिटीचा दर्जा मिळाला.

बोर्द्युने मात्र याउलट सोशलकॅपीटलचा वापर समाजात नकारात्मकरित्या कसा केला जातो हेच सांगण्यावर भर दिला. एखाद्या गटाशी, संस्थेशी, समाजाशी जेव्हा माणुस जोडला जातो तेव्हा त्या संस्थेचे स्वतःचे एक सामाजिक भांडवल असते. ते कुठल्याही स्वरुपात असु शकते. ते आर्थिक स्वरुपात असेल. कदाचित त्या गटाची एखादी पतपेढी असेल. ते शैक्षणीक स्वरुपात असेल. कदाचित त्या संस्थेच्या शाळा असतील, इतर शैक्षणिक संस्था असतील. आणि असे असल्यास त्या गटाशी जोडल्या गेलेल्या माणसाला या भांडवलाचा वापर करता येऊ शकतो. अशा वेळी या सोशल कॅपिटलमुळेच कशा अनिष्ट सामाजिक रुढी पडतात आणि त्यामुळे सामाजिक विषमता राखण्यास कशी जन्माला येते किंवा असलेली सामाजिक विषमता पुन्हा पुन्हा अधोरेखित केली जाते हे बॉर्द्युने वारंवार सांगितले. आमच्या एका नातेवाईकाची हकिकत आहे. मुंबईच्या कापडगिरण्या बंद झाल्यावर वडिलांच्या ओळखीमुळे कुणा नेत्याने या मुलाला सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते मुलाने नम्रपणे नाकारून राहण्याच्या जागेपासून लांबवर का होईना पण स्वतःचे स्टेशनरीचे दुकान उघडले. मला कारण सांगताना तो म्हणाला की ही नेते मंडळी उपकारांची परतफेड म्हणून काय अपेक्षा करतील सांगता येत नाही. आमच्या या नातेवाईकाने नकळत सोशलकॅपिटलच्या मूलभूत नियमाला स्पर्श केला होता.

अतुल ठाकुर

मै दिल हूं इक अरमान भरा…

समाजशास्त्राचा एक विद्यार्थी म्हणून इतिहासकाळापासून जगात जे महत्वाचे बदल झाले त्यांचा आम्हाला अभ्यास करावा लागतो. म्हणजे भटक्या जमाती हळूहळू कमी झाल्या. लोक शेती करायला लागले. एका जागी स्थिर झाले. पुढे विज्ञानाचे युग आले, कारखानदारी सुरु झाली. जूने जग नाहीसे होऊ लागले. हिन्दी चित्रपटाचा इतिहास पाहू गेल्यास असेच बदल दिसू लागतात. अमिताभ युग सुरु होताना आद्य सुपरस्टार राजेश खन्ना युगाचा अस्त झाला होता. मात्र अशा काळात देखील एखादा दिलीपकुमार आपला आब शेवटपर्यंत राखताना दिसतो. कुणाचाही जमाना येवो प्राण, अशोककुमार, संजीवकुमार, नसीर, ओम पुरी यांना पर्याय नव्हतेच. पार्श्वगायनात लताचे साम्राज्ञीपद अढळ राहिले. लताचा अपवाद सोडल्यास चित्रपटसृष्टीने रफी युग पाहिले. किशोरकुमारचा उदय झाला. तरीही कभी कभीची गाणी मुकेशकडेच गेली. तसे तलतचे झाले नाही. नव्या जमान्यात तलतचा अस्तच झाला. हे विधान मी फक्त चित्रपटसंगीताच्या बाबतीत करीत आहे. हे नक्की कशामुळे झालं असावं?

तलतचा आवाज ऐकला की मनात काय येतं? एक सभ्य, सुसंस्कृत, सुशिक्षित, हळव्या स्वभावाचा भावनाप्रधान नायक. या स्वरात गाणारा माणुस मुलींची टिंगल टवाळी करणे, समाजाच्या विरोधात जाणे, सूड उगवणे अशा गोष्टी करण्याची शक्यता कमीच. उलट हा नायिकेला दुरुत्तरेही करणार नाही. अन्याय सहन करून हा नायक “जाये तो जाये कहां”, “अंधे जहां के अंधे रास्ते”, “मेरी याद में तूम ना आंसू बहाना”, “जिंदगी देने वाले सून” आणि “फिर वोही शाम वोही गम वोही तनहाई है” असे म्हणून आपल्या दुःखाला एकट्याने वाट करून देईल. राजेशखन्नाचा नायकही भावनाप्रधान होता. पण तो गाडीच्या खिडकीत बसलेल्या नायिकेला “मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तू” म्हणत खट्याळपणा करू शकत होता. तलतचा नायक हे करणे शक्य नव्हते. जग बदलत चालले होते. पुढे सत्तरच्या दशकात भारतात बरीच उलथापालथ झाली.

एक युद्ध झाले. बेकारी वाढत होती. तरुण संतप्त होते. हा अंगार घेऊन अमिताभ नावाचा झंझावात येऊ घातला. “रो मत पुष्पा” हे म्हणणाऱ्या नायकापेक्षा पुष्पाच्या डोळ्यात आसवे आणणाऱ्याला चोपून काढणारा नायक लोकांना आवडू लागला आणि काकाचा अस्त झाला. जेथे खट्याळपणा करणाऱ्या नायकाचाही अस्त झाला तेथे तलतच्या परीटघडीच्या नायकाचा आणि आवाजाचा निभाव लागणे कठीणच होते. गंमत म्हणजे समकालिन मुकेशचा आवाज दिलिपकुमारलाही शोभून दिसला आणि अमिताभच्या कभीकभीतील शायरालाही फिट्ट बसला. तसे तलतच्या बाबतीत घडले नाही. हे रेंजमुळे झालं असावं. रफीचा आवाज कुठल्याही नायकाला आणि कुठल्याही प्रकारच्या गाण्याला चपखल बसत होता. तलतच्या आवाजाला येथे मर्यादा होत्या. तलतच्या आवाजात गाणाऱ्या नायकाचे एक विशिष्ट व्यक्तीमत्व पडद्यावर तयार होत होते अशी माझी प्रामाणिक समजूत आहे. त्यामुळेच तलतचा आवाज वापरण्यावर मर्यादा आली असावी. मात्र त्या आवाजाच्या मर्यादेत तलतला तूलना नाही हे देखील तितकेच खरे.

तलतचं एकेक गाणं म्हणजे एकेक कोरीव लेणंच आहे. “आंखोंमे मस्ती शराब की”, “आंसू समझ के क्यूं मुझे”, ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल”, बेचैन नजर बेताब जिगर”, फिर वोही शाम वोही गम”, मै तेरी नजर का सुरुर हूं”, सबकुछ लुटा के होश में आये तो क्या किया”, “अश्कों में जो पाया है”, “प्यार पर बस तो नही है मेरा लेकीन फिर भी”, “दिल मतवाला लाख सम्हाला”, “हमसे आया न गया”, “ये हवा ये रात ये चांदनी”, “सीने में सुलाते है अरमां”, “शामे गम की कसम”, “जब छाये कभी सावन की घटा”, “जलते है जिसके लिये”, “राही मतवाले”, “रात ने क्या क्या ख्वाब दिखाये” अशासारखी किती गाणी सांगावी? द्वंद्व गीतात तर नायिका या हळव्या नायकाला हळूवारपणे सांभाळून घेत आहे असाच मला फिल येतो. जिज्ञासूनी त्यासाठी लता तलतचे सुहागनमधील “तुम्ही तो मेरी पुजा हो” हे गाणे जरूर ऐकावे.

तलतचा गायक म्हणून अस्त होण्याचे एक कारण त्याने अभिनय करण्याचा केलेला अट्टाहास असे दिले जाते. त्यात तथ्य असेलही. पण बदललेली सामाजिक परिस्थिती हे मला त्यामागचे महत्वाचे कारण वाटते. पण तरीही तलतच्या आवाजाची जादू आजही तिळभर कमी झालेली नाही. सासरी गेलेल्या मुलींची माहेरची ओढ कमी होते का? तेथे गेल्यावर त्यांचा पाय निघत नाही. तलतने आपल्या गाण्यांमधून ते सुंदर जुने जग आजही जिवंत ठेवले आहे. तलतच्या नायकाचा अस्त झाला असेल पण आजही तो आदर्श ठेवावासा वाटतो हेच त्या आवाजाचे यश आहे असे मला वाटते.

अतुल ठाकुर

One Flew Over the Cuckoo’s Nest – पॉवर आणि फॉल्स काँन्शसनेस

चित्रपट आणि समाजाचा घनिष्ठ संबंध असतो. समाजात घडलेल्या अनेक गोष्टींचे प्रतिबिंब चित्रपटात पडत असते. पण काही चित्रपट हे अगदी एखाद्या शास्त्राच्या कसोटीवर घासून पुसून पाहता येतात. त्या चित्रपटात ओळखीच्या अनेक खुणा सापडतात. जॅक निकलसनचा One Flew Over the Cuckoo’s Nest पाहताना हे वारंवार जाणवत होते. चित्रपट म्हणून त्यात एक झपाटून टाकणारी कथा आहेच. पण त्याही पलिकडे या कथेत आणखी एक कथा आहे ज्यात अनेकानेक समाजशास्त्रीय सिद्धान्त दडलेले आहेत. विशिष्ट तर्‍हेचे वर्तन आणि केलेले काही गुन्हे यावर मानसोपचार घेण्यासाठी दाखल केलेल्या जॅक निकलसनला मनोरुग्णालयात फार काळ राहावे लागेल असे वाटत नाही. त्याचा सुरुवातीचा काळ बरा जातो. उत्साहाने रसरसलेला जॅक तेथे अनेकांशी मैत्री देखिल करतो. पण स्वातंत्र्याची ओढ असलेल्या त्याला तेथिल वातावरण हळुहळु जाचक वाटू लागते. तेथून तो पळून जाण्याचा प्लान करतो. जवळपास यशस्वीदेखिल होतो. पण एका रुग्णामुळे हा बेत फसतो. शेवटी जॅकचे काय होते हे चित्रपटातच पाहणे योग्य. या कथेत छोट्या छोट्या अनेक जागा अशा आहेत ज्यावर बोलता येईल. पण त्याही गोष्टींचा आनंद चित्रपट पाहतानाच घ्यावा असे मी सुचवेन.

सामाजिक नीति नियमांच्या आधारे जोपर्यंत आपण चालतो तोपर्यंत सारे काही आलबेल सुरु असते. त्याविरुद्ध जाणारी व्यक्ती सापडली तर समाज त्याला शिक्षा करतो. आपल्याकडे जातीबाहेर लग्न केलेल्यांना वाळीत टाकलं जातं. याला कायद्याचा आधार नाही. पण समाजातील काही व्यक्ती एकत्र येऊन दुसर्‍याला ही शिक्षा देत असतात. त्याचप्रमाणे काही संस्थामंध्ये विशिष्ट प्रकारची वर्तणूक अपेक्षित असते. त्यात मुरलेल्या व्यक्तींकडे सर्वजण नियम पाळून वागतील हे पाहण्याची जबाबदारी असते. हे नियम तोडले की शिक्षा ठरलेली. या शिक्षेला मर्यादा अशी नाही. कारण समाजच अशी शिक्षा देतो. किंवा काही संस्था अशी शिक्षा देतात. जॅक ज्या मनोरुग्णालयात दाखल आला आहे तेथेही असेच काही कडक नियम आहेत. ज्याला “नॉर्मल” म्हणता येईल असे वागण्याच्या पद्धती ठरलेल्या आहेत. त्याहून तुम्ही वेगळे वागलात तर तुम्ही “नॉर्मल” नाही. “नॉर्मल” काय आणि अ‍ॅबनॉर्मल” काय हे कुणी ठरवायचं? तर ज्यांच्या हातात सत्ता आहे आणि अर्थातच त्यामुळे पॉवर आहे त्यांनी.

यामुळेच सर्वांहून वेगळे वागणार्‍या आणि स्वातंत्र्याची ओढ असलेल्या, गतानुगतिकांप्रमाणे मेंढरांमधील कळपाचा एक भाग नसलेल्या जॅकला एक दिवस या मनोरुग्णालयात उपचार म्हणून इलेक्ट्रीक शॉकला सामोरे जावे लागते. आम्ही ज्याला ‘नॉर्मल” म्हणतो तसे तुम्ही नाही आहत. जोपर्यंत तुम्ही “नॉर्मल” होत नाही तुम्हाला अशा तर्‍हेच्या भीषण उपचारांना सामोरे जावे लागणारच अशी येथील परिस्थिती असते. आपल्याकडे क्वचित जेव्हा जातीबाहेर लग्न केलेल्या जोडप्याला ठार मारले जाते तेव्हा याहून वेगळे काही घडत नसतेच. काही रुढी, काही रिती या जर कुणी मोडायला निघाला तर त्याचे वागणे हे “अ‍ॅबनॉर्मल” समजले जाते आणि त्यावर सर्वजण “उपचार” सुरु करतात. मनोरुग्णालयात दाखल झालेल्या जॅकची वर्तणूक अशा जगावेगळ्या तथाकथित “अ‍ॅबनॉर्मल” लोकांसारखी असते. त्याला सुरुवातीला असे वाटते की सर्वांनाच येथे त्याच्याचसारखे डांबून ठेवले आहे. पण जेव्हा त्याला कळते की काहीजणांनी स्वखुशीने हा तुरुंगावास पत्करला आहे, त्यांना येथे राहण्याचे कसलेही बंधन नाही, त्याला चांगलाच धक्का बसतो. स्वातंत्र्याची ओढ सर्वांनाच असते असे नाही. मेंढराप्रमाणे कळपामागून धावण्यात सुरक्षितता मानणारे, मोठ्यांनी सांगितले ते कसलिही शंका न घेता आचरणारे असंख्य लोक असतात. जॅकला मात्र हे जमणारे नाही. त्याचा येथून जाण्याचा निश्चय पक्का आहे. समाजशास्त्राचा विद्यार्थी म्हणून जेव्हा मी या चित्रपटाकडे पाहतो तेव्हा अनेक सोशल थियरीजमध्ये आणि या चित्रपटाची घडण आहे त्यात मला साम्य आढळते.

समाजशास्त्रात मार्क्स आणि विशेषतः फूको यांनी काही सिद्धान्त मांडले आहेत त्याला थेयरीज ऑफ डेव्हियंस म्हणतात. फूकोच्या म्हणण्यानूसार (Discipline and Punishment) शिस्त आणि शिक्षेचा वापर अशा तर्‍हेचे तथाकथित चुकीच्या वर्तन सुधरवण्यासाठी केला जातो. त्यासाठी भीतीचाही सर्रास वापर होतो. पॉवरचा वापर करून माणसावर निरनिराळ्या तर्‍हेचे दडपण आणले जाते. हे सारे अनेकदा कायद्याच्या चौकटीत राहून केले जाते. One Flew Over the Cuckoo’s Nest मध्येही शिक्षेचे प्रमाण वाढत गेलेले दिसते. ज्यांच्या हाती सामर्थ्य आहे त्यांनी जे नीति नियम ठरवले आहेत तेच “नैसर्गिक” आणि “नॉर्मल” आहेत. त्याप्रमाणे जे वागतील त्याच माणसांना समाजात राहता येईल. त्याहून वेगळे वर्तन करणार्‍यांवर या सामर्थ्यवानांनी ठरवलेले “उपचार” केले जातात. मार्क्सवादी मांडणीत “फॉल्स कॉन्शसनेस”बद्दल बोललं जातं. त्यानूसार सामर्थ्यवान माणसांचे तत्त्वज्ञान हे आपोआपच नैसर्गिक आहे असं इतरांकडून गृहीत धरलं जातं. बंधन नसलेली माणसेही स्वखुशीने मनोरुग्णालयात राहतात याचे कारण तेच असते. फारसा विचार न करता ही मंडळी समोरच्याचे ऐकतात. त्यांना आपण बंधनात आहोत हे जाणवतदेखिल नाही. किंबहूना हेच योग्य आहे असेही वाटते.

सामर्थ्यवान माणसे, ज्यांच्याकडे सर्वतर्‍हेची पॉवर आहे ती समाजातील माध्यमांचा उपयोग आपल्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी वापरत असतात. चित्रपटात दाखवलेल्या मनोरुग्णालयात ज्यांच्या हातात “अ‍ॅडमिनिस्ट्रेशन” आहे त्यांच्या हातात ही सत्ता असते. जॅकला तेथे दाखल झाल्यावर ठरलेल्या चाकोरीतून जायला शिकवले जाते. पण तो बधत नाही. मग शिक्षेचे प्रमाण वाढू लागते. अशावेळी समाजातील अन्यायकारक नियमांबद्दल जे आवाज उठवायला पाहतात त्यांचे काय होते हेच One Flew Over the Cuckoo’s Nest हा चित्रपट दाखवतो.

अतुल ठाकुर

गळा मोती एकावळी काळी वो माय…!

एकदा नवरात्र असताना मंडपातून दुरून, अस्पष्टसे गाण्याचे स्वर ऐकू आले, “रात्र काळी, घागर काळी, यमुनाजळी ही काळी वो माय”. आवाज स्पष्ट नसल्याने ओरिजनल गाणे लावले आहे की नाही ते ओळखु शकलो नाही. मात्र चित्राने मूळ वस्तुची आठवण यावी त्याप्रमाणे गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकरांच्या या गाण्याने मन भूतकाळात निघून गेले. माझं काही गाण्यांनी असं होतं. जणू काही टाईम मशीनमध्ये बसून टाईम ट्राव्हल करावी तसं मन जुन्या जगात निघून जातं.

एखादी सभ्य शांत, मराठी मध्यमवर्गीय वस्ती असावी, रेडीयो वाजण्याचे दिवस असावेत, संध्याकाळची वेळ असावी घरात पिवळे बल्ब लावलेले असावेत आणि हे गाणे कानी पडावे. या गाण्याची चालही तशीच, सभ्य आणि शूचिर्भूत. हे गाणं जुन्या प्रेमळ शिक्षकाच्या घरातच जणू काही शोभावे. आता ही विशेषणे गाण्याच्या चालीला लागत नाहीत हे मला ठावूक आहे. पण तरीही हे गाणं ऐकताना असंच वाटतं. या अविस्मरणीय गाण्याविषयी आणखी काही वेगळं वाटत राहतं. ज्यांनी ही रचना केली ते विष्णूदास नामा आणि आपले नामदेव महाराज एकच का हे मला माहित नाही. मात्र ही रचना मला शंकराचार्यांच्या केवलाद्वैताची आठवण करून देते.

केवलाद्वैताची आठवण आली की संस्कृतचे वेदान्ताचे वर्ग आठवतात. वेदान्ताची परीक्षा दिली नाही. कारण तेवढे धाडस नव्हते. पण आम्हाला वेदान्त शिकवणार्‍या प्राध्यापिका डॉ. शकुंतला गावडे यांच्या वर्गात जाऊन बसत असे. तेथे ब्रह्म, माया, अध्यास, साधन चातुष्ट्य, केवलाद्वैत, मध्वाचार्य, निंबार्क, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, विशिष्टाद्वैत सत्य, मिथ्या, विवर्तवाद, सत्कार्यवाद, सांख्य, योग, बौद्धमत यांच्याबद्दल ऐकले. या विषयात रस होताच. पण सुदैवाने माझ्या असंख्य शंकांना शांतपणे, समाधान होईपर्यंत उत्तरे देणार्‍या शकुंतला मॅडमसारख्या शिक्षिका मला लाभल्या.

त्या जुन्या काळच्या शिक्षकांप्रमाणे आपल्या विषयाची चौफेर आणि परिपूर्ण तयारी करून येत असत त्यामुळे त्या वेदान्त शिकवत असताना मला एखादी सस्पेन्स फिल्म पाहिल्याचा फिल येत असे. शंकराचार्यानी कुणाचे मत कसे खोडले त्याबद्दल आधी पूर्व पक्ष मांडल्यावर शंकराचार्य त्याचे खंडन कसे करतात याची उत्सुकता लागून राहात असे. मग एखादे कोडे उलगडावे त्याप्रमाणे त्याचा उत्तरपक्ष त्या सविस्तरपणे मांडत. त्यांचे शिकवण्याचे कौशल्य जबरदस्त होते. या वेदान्ताच्या वर्गाचा कंटाळा कधी आलाच नाही. “रात्र काळी…” गाणे ऐकल्यावर त्यांनी शिकवलेल्या गोष्टी आठवल्या.

जगात दिसणार्‍या यच्चयावत गोष्टींमागे एकच एक तत्त्व आहे. आणि मिथ्या याचा अर्थ खोटे असा नसून अशाश्वत हा जास्त योग्य अर्थ अहे हे सांगणार्‍या केवलाद्वैताचे तत्त्वज्ञान यात सांगितले आहे असे वाटत राहते कारण, रात्र, घागर आणि यमुनाजळ या तिन्हींचा रंग काळा आहे. जी सखी पाणी भरायला गेली आहे तिचे बुंथ, बिलवर हे अलंकारही काळे आहेत. तिने नेसलेली वसनेही काळी आहेत.

आणि गाण्याच्या चरम सीमेला संत म्हणतात “कृष्णमूर्ती बहु काळी वो माय”. या ओळीत हा अद्वैतप्रवास पूर्ण होतो अशी माझी समजूत आहे. हा काळीमा जणू ब्रह्मतत्त्व आहे. जे चराचराला व्यापून उरले आहे. जीव आणि जगतच नव्हे तर ज्याला आपण सगुण ईश्वर म्हणतो त्यालादेखील त्याच तत्त्वाने व्यापले आहे असेच या अभंगाच्या रचयित्याला म्हणायचे असावे.

साजणी एकलीच पाण्याला जाते आहे अशावेळी तिजसोबत सावळी मूर्ती पाठवा असे संत येथे म्हणतात. म्हणजेच जगात वावरत असताना ईश्वराचे स्मरण असावे, एकलेपणाने वावरू नये. येथे द्वैताचा आधार घेतलेला दिसतो. याचे कारण मानवी मर्यादा हे असावे. प्रत्येकाला सुरुवातीला अद्वैत झेपेलच असे नाही. मात्र हे सांगत असतानाच तात्त्विक दृष्ट्या भेद नाहीच. ज्याला मी माझी स्वामिनी मानतो ती देखील म्हणजेच भगवान कृष्णही काळाच आहे असे संत म्हणतात आणि अद्वैत सूचित करतात असे मला नम्रपणे वाटते.

अतुल ठाकुर

एका सीन बद्दल – जॅक निकलसन आणि ओम पुरी – वोल्फ

लांडग्याने चावलेल्या माणसाचे पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण लांडग्यात रुपांतर होणे ही कथाही तशी चावून चोथाच झालेली आहे. पण अशा माहित असलेल्या कथांना दिग्दर्शक “ट्रिटमेंट” कशी देतो हे फार महत्त्वाचं असतं. आणि ते रसायन जर नीट जमलं तर जबरदस्त चित्रपट बनतो. जॅक निकलसनच्या “वोल्फ” ची गणना त्याच्या ग्रेट चित्रपटांमध्ये कुणी करीत असेल असे वाटत नाही पण मला हा चित्रपट फार आवडतो. काही कलाकार त्यांच्या नुसत्या “असण्याने” सीन घेऊन जातात. जॅक निकलसन मला तसा वाटतो. सिर्फ प्रेझेंन्स काफी है. पण या चित्रपटात एका सीनमध्ये आपल्याकडचा एक बाप कलाकार ओम पुरी फक्त दोन तीन मिनिटांसाठी आला आहे. आणि सीन घेऊन गेला आहे.

नायकाला लक्षात येतं की आपल्यात लांडग्याचे काही गुणधर्म येऊ लागले आहेत. आणि ही प्रक्रिया थांबवण्यासाठी तो एका डॉक्टर कम मांत्रिकाकडे जातो. वृद्ध ओम पुरी दरवाजा उघडतो आणि या अविस्मरणीय दृश्याची सुरुवात होते. यात बरेच संवाद आहेत. जोडीला ओम पुरीचा तो खास आवाज आहेच. सारे काही इथेच सांगून सीनची मजा घालवायची नाहीय. पण एक दोन गोष्टी सांगण्याचा मोह आवरत नाहीय. एका ठिकाणी ओम पुरी चेहर्‍यावर मिस्किल हसु आणून जॅकला सांगतो “वोल्फ चावलेले सर्व जण वोल्फ बनत नाहीत. तुझ्यात मूळातच काहीतरी वोल्फसारखं असणार”. पुढे बोलताना तो सांगतो ” वोल्फ बनण्यासाठी वोल्फ चावायलाच पाहिजे असं नसतं. मियर पॅशन ऑफ वोल्फ इज इनफ”.

या दोन वाक्यात ओम पुरी वैश्विक सत्य सांगून गेला आहे असं मला वाटतं. सारं मानसशास्त्र त्यात आलंय. मूळात तुमच्या स्वभावात तो गुणधर्म असतो. पुढे परिस्थितीमुळे तो सघन होत जातो. आणि वाईटाबद्दल प्रेम असेल आणि त्याचीच सतत उजळणी असेल तर ते विचार पुढे आचारात उतरतात आणि कर्म तशीच घडून माणुस तसाच बनत जातो. आता हे अनेकांना न पटण्याची शक्यता आहे. पण एका चित्रपटात एका अमानुष गोष्टीची चर्चा होत असताना काहीवेळा अतिशय मार्मिक गोष्टींना स्पर्श केला जातो. त्यातलंच हे एक उदाहरण आहे.

अतुल ठाकुर

मर्यादांचे भान

अलिकडेच काही कामासाठी विद्यापिठात गेलो होतो. आमचे समाजशास्त्राचे प्राध्यापक भेटले. ते निवृत्त झाले होते. ते ही काही कामासाठी आले असावेत. ते आपल्या गाडीत आणि मी बाहेर असा काहीकाळ सुखसंवाद झाला. अतिशय कडवे मार्क्सवादी असलेले सर आता काहीसे निराश वाटत होते. जीवनाला अर्थ नाही. आपण त्याला जो देऊ तोच अर्थ आणि तो देखील बरोबर असेलच असं नाही याची जाणीव असायला हवी असं काहीतरी बोलत होते. या सरांशी संवाद होऊ शकतो असा माझा अनुभव होता. विद्यापिठातल्या इतर डाव्या विद्वानांबद्दल मनात अत्यंत तिरस्कार असल्याने ती मंडळी कधी भेटली तर मी बोलणे टाळतोच. यांचा एक अपवाद. ते नेहेमीचीच तक्रार करत होते पण आवाजात पूर्वीसारखा जोश नव्हता. सध्या “हाऊ टू” चा जमाना आहे “व्हाय” हा प्रश्न कुणी विचारत नाही आणि विचारला तर त्याला गप्प केले जाते. मार्क्सवादी मांडणीप्रमाणे सिस्टीममध्येच प्रॉब्लेम आहे. त्याबद्दल बोलायला कुणीच तयार होत नाही हे सरांचे दुखणे होते.

मी काय करतोय याबद्दल मी विद्यापिठात किंवा त्याच्या आवारात बोलत नाही कारण अनेक विद्वानांच्या मते “व्यसनमुक्ती” हे काम फारसे महत्वाचे नसावे. त्याने कुठे सर्वंकष क्रांती होते? सरांना सिस्टीम बदलणे महत्वाचे वाटत होते. नेमके इथेच मला गांधी महत्वाचे वाटू लागले होते. गांधींना माणसांच्या मर्यादांचे भान होते. ज्याला आवडेल, जे झेपेल असा कार्यक्रम देण्यास ते तयार होते. याचा अर्थ त्यांना सिस्टीममधल्या खाचाखोचा माहितीन नव्हत्या असं नव्हतं. जो आपल्या मर्यादेत राहून आपल्याला झेपेल तेच काम करु इच्छित असतो त्याला समाजाचे व्यापक प्रश्न माहित नसतात हा डाव्या विद्वानांचा अत्यंत आवडता गैरसमज आहे. गंमत म्हणजे याच विचारसरणीमुळे एकदा क्लास नाहीसा झाला की कास्ट आपोआपच नाहीशी होईल असे काहीजण मानत. किंबहूना उद्योगिकीकरण झाले की कास्ट नाहीशा होणार हे भाकीतही खरे झाले नाही. आज आपल्याला उद्योगिकीकरणाच्या रेट्यामुळे गाडीत आपल्याबाजूला कोण बसलंय त्याची जात नाहीत नसते आणि आपण त्याची पर्वाही करीत नाही हे खरे असले तरी राजकारणात जातींचे ध्रूवीकरण झाले आहे हे अमान्य करता येणार नाही.

जगभर मार्क्सवाद संपत आला. जेथे टिकवण्याचा प्रयत्न झाला तेथे प्रचंड रक्तपात झाला. अनेक मार्क्सवादी विद्वानांचा असा समज आहे की मार्क्सवाद इव्हॉल्व होतो आहे. मार्क्सला अभिप्रेत क्रांती जेव्हा येईल तेव्हा येईल. पण ज्याला आपल्या मर्यादेत राहून काही काम करायचे आहे त्याच्याबद्दल तुच्छता व्यक्त करणे हा आयव्हरी टॉवरमध्ये राहणाऱ्या विद्वानांचा एक आवडता छंद होऊन बसला हे नक्की. अर्थातच अशांची मान्यता आपल्या कामाला मिळावी असं मला आता वाटत नाही. याचं एक महत्वाचं कारण लोकांचे माझ्या अगदी छोट्याशा कामाबद्दल चांगले अभिप्राय येऊ लागले हे आहे. मला आज देखील कुणी म्हटले की “तुमचं व्यसनमुक्तीवरचं लेखन वाचून व्यसन सोडावंसं वाटलं”, “तुमच्या लेखनामुळे व्यसनमुक्त राहायला मदत होते” की फार समाधान वाटते. या समाधानाचे मोल कशानेही होऊ शकत नाही. सर्वंकष क्रांती यायची तेव्हा येवो. एक माणुस बदलतो तेव्हा त्या प्रमाणात समाजही बदलतो हे मला पटलंय.

अतुल ठाकुर